प्रत्येकाच्या आयुष्यात एक आठवणींची खिडकी असते.. कातरवेळी असच खिडकीशेजारी उभं राहून बाहेर नजर टाकता आपला भूतकाळ चित्रपटासारखा डोळ्यासमोरून सरकू लागतो.. आणि बाहेरचा कोलाहल, गर्दी यापेक्षा आपल्या मनातील साठलेली आठवणींची गर्दी एक एक करून समोर येऊन आठवणी ताज्या करते..
मग या आठवणी सुखाच्या असतील, दुःखाच्या असतील, आपण कुणाला मदत न केल्याच्या असतील अथवा आपल्याला नात्यात, प्रेमात आणि शब्दांत कुणी फसविल्याच्या असतील. कधीकधी काहीही कारण नसतांना आयुष्यात येऊन गेलेली खूप माणसे नकळत या खिडकीपाशी येऊन आपल्या कानात बोलून जातात असा भास होतो.. काहीच गरज नसतांनाही गर्दीत एकटं पडल्यासारखं वाटतं.. माणसाच्या स्वभावाला औषध नाही.. या खिडकीपाशी महिला उभ्या असतील तर क्षणार्धात त्यांना त्यांच्या माहेरची माणसं, आई वडिलांचे घर, मित्र - मैत्रिणी आठवून जातात. खरे तर ही खिडकी आपल्या मनात साठवून ठेवलेल्या आणि सहसा कधीच बाहेर न येणाऱ्या दस्त-ऐवजाची साक्षीदार असते. प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असू शकतात. काही माणसे खूप भावनिक असतात तर काही दगडा सारखी कोरडी. मात्र, तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात ही खिडकी असतेच. आणि ही खिडकी यासाठी जपायची असते की या आठवणीच तुम्हाला भाव भावना असलेली व्यक्ती म्हणून जगण्याची कायम प्रेरणा देत असते..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.