मनातलं पान..
या विषयावर मी अनेकदा जाहीर व्याख्यानांत बोललो आहे यावर खूपदा लिहिले सुद्धा आहे. आणि माझ्या अगोदर सुद्धा अनेक लोक बोलले आहेत आणि कायम बोलत राहतील. पण, मानवी स्वभाव असा आहे की मोजकी मंडळी वगळता मोठ्या प्रमाणावर लोक फक्त त्यांच्या बुद्धी प्रमाणेच अल्प विचार करतात..
खूपदा वेळ निघून गेल्यावर आपल्याला एखाद्या व्यक्तीची आणि त्या व्यक्तीने केलेल्या मार्गदर्शनाची, सल्ल्याची आठवण येते.. आपण आपल्या गुर्मीत आणि क्षणिक यशात इतके गुरफटलेले असतो की आपल्याला आपल्या जवळच्या माणसांसाठी अजिबात वेळ नसतो.. समोरची व्यक्ती आपलं समजून आपल्याला अनेक संधी देत असते. मात्र, आपण खूप शहाणे असल्याच्या अविर्भावात ती संधी नाकारीत असतो. आपल्याला नेहमी हरभऱ्याच्या झाडावर चढविणारी माणसे आपली वाटतात. जे आपल्या भल्यासाठी स्पष्ट बोलत असतात त्यांना आपण आपले दुश्मन समजतो..
काही मंडळी मित्रां पेक्षा मैत्रिणींचे प्रमाणापेक्षा जास्त ऐकतात आणि नात्याची माती करून घेतात.. आणि काही मंडळींना हे वेळ निघून गेल्यावर कळते.. आता आमच्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे म्हणाल तर मी अनेकांना संधी देण्याचा वारंवार प्रयत्न करतो. पण एक टक्का लोक वगळता बाकीच्यांना या संधीचे सोने करता येतच नाही. आज हवेत उडणारे अनेक लोक उद्या आपल्याला जमिनीवरच यायचे आहे हे विसरून जातात.. आणि कितीही नाही म्हटले तरी त्यावेळी त्यांच्या सोबत आमच्यासारखे हितचिंतकच असतील हेही त्यांनी लक्षात ठेवावे.. गंमत आणि शोकांतिका अशी आहे की, तुम्हाला देणाऱ्याचे हात हजारो असतात. पण, जर तुमची झोळीच फाटकी असेल तर त्याला तो देणारा तरी काय करणार ??
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.