जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..
स्वर्ग नरक यावर माझा शून्य टक्का ही विश्वास नाही. जे आहे ते इथेच आहे आणि एकदा मेल्यावर पुन्हा या पृथ्वीवर जन्म मिळेल ना मिळेल याचीही अजिबात शाश्वती नाही. जे जगायचं ते आताच आणि इथेच जगायचं आहे आणि म्हणूनच आपण आपल्यातील माणुसकी जपायला हवी. स्वर्गात जाऊन तिथे काय आहे हे सांगायला कुणीच मेलेला माणूस खाली आलेला नाही.. मी तुम्हाला सांगितले आणि तुम्ही ते मीठ मिरची लावून इतरांना सांगितले आणि यातूनच हे स्तोम पसरत गेलं. आज आपण राष्ट्रपुरुषांना सुद्धा जातीत विभागून घेतल्यामुळे मनातली जातीयता अद्यापही संपुष्टात आलेली नाही. पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्याला प्रगती करायची असेल तर वास्तव स्वीकारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारा.. आज देवळांपेक्षा शाळा, रोजगार, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते तथा सर्वसामान्यांना गरजेच्या असलेल्या सुविधा उपलब्ध करू द्यायला हव्यात. पण पुढे जाण्या ऐवजी काही मंडळी पुन्हा आपल्याला मागे घेऊन जात आहेत आणि जाती पाती मध्ये, माणसा माणसांत स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भांडणे लावीत आहेत. म्हणून जागे व्हा आणि एकमेकांकडे फक्त माणूस म्हणून बघायला शिका.. मानवता, माणुसकी आणि प्रेम जपायला शिका आणि ते वाढवा.. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.. कारण धर्म ही अफूची गोळी असल्याचे कार्ल मार्क्स आणि इतर अनेक तत्ववेत्यांनी केव्हाच सांगून ठेवले आहे.. आणि मला ते मान्य आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.