चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही. आणि आपल्या शब्द खड्गची ही खासियत आहे की आपण सर्वसामान्य लोकांना बोलते करतो..
आता सर्वसामान्य लोकांनाच का तर याच लोकांची मते आणि भावना अगदी प्रामाणिक असतात.. सहज चहा पितांना आजूबाजूच्या लोकांना छेडले.. आता चहाचे हॉटेल आमचे नेहमीचे असल्याने तिथे येणारी खूपशी मंडळी आम्हाला ओळखणारी आहे. या मंडळींना सध्याच्या महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकार बद्दल आणि त्यांच्या कारभारा बद्दल छेडले असता, महाराष्ट्र आणि केंद्रातील ही दोन्ही सरकारं फक्त बडेजाव मिरविणारी आणि मीडियात स्वतःची लाल करणारी आहेत असा सूर नव्वद टक्के लोकांनी आळवला. गप्पांच्या ओघात खूप विषय झाले मित्रांनो आणि लोक मनाला जे वाटेल आणि पटेल ते बिनधास्त बोलत गेले. अजित पवार यांचा मृत्यू घातपात नाही तर मग सरकार तक्रार का नोंदवून घेत नाही ? रोहित पवार आणि अमोल मिटकरी सारख्या आमदारांना पोलीस जुमानीत नाहीत तर सर्वसामान्यांना काय जुमानतील ? पोलिसांचा बोलविता धनी कोण आहे ? नरेंद्र मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांच्या समोर येऊन उत्तरे का देत नाहीत. ते थेट मीडिया एपस्टीन फाईल आणि त्यात आलेल्या पंतप्रधानांच्या नावाची शहानिशा का करीत नाही ?
सरकार गरिबांचे आणि लोकशाही मार्गाने चालणारे नाही तर हुकूमशाही मार्गाने चालणारे आहे. सरकार कुणाचेही असो आम्हाला घेणेदेणे नाही मात्र, निवडून दिलेल्या सरकारने सर्वसामान्य जनतेला शांततेने त्यांच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होऊन जगता यावे यासाठीच काम करावे.. मराठी माणूसच मराठी माणसाच्या उरावर बसला आहे. मराठी माणूस आपापसात देखील मराठी बोलत नाही.. लाचखाऊ मीडिया आणि राजकारण्यांना ठोकून काढा.. ते थेट या सरकारला खाली खेचायला हवे, हे सरकार थापाड्यांचे आहे. बॅलेट पेपरवर मतदान घ्या, जे निवडून येऊन लोकांची कामे करीत नाहीत त्यांना घरी बसविण्याचा कायदा करा, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक रिल च्या नावाने जो नंगा नाच करीत आहेत त्यांना कायद्याने आवरा, पोलसांची मग्रुरी उतरावा, छोट्या मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या.. ते थेट काही महिला कायद्याचा गैरवापर करून नवऱ्याला, सासू-सासऱ्यांना त्रास देतात.. कुठल्याही आईने आपल्या मुलीच्या संसारात अवास्तव हस्तक्षेप करू नये असे अनेक विषय रंगत गेले. या चर्चेला अंत नव्हता.. मात्र, लोक सरकार जे फसवे दावे आणि आपण प्रगती केली हे म्हणत आहे ते मात्र या कटिंग पिणाऱ्या लोकांना अजिबात मान्य नाही. आठ दहा रुपयांची चहाची कटिंग पिणाऱ्या सर्वसामान्य लोकांनी सरकार कुणाकुणाशी आणि कशी कशी सेटिंग करून स्वतःची वाहवा करून घेत आहे याची जबरदस्त खिल्ली उडवली..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.