नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर ते जुळतेच. रक्ताच्या नात्या पेक्षा इतर नाती जास्त कामी येतात हेही अनुभवाने सिद्ध झालेले आहे..
कुणी या नात्याला मैत्री म्हणतं, कुणी याला प्रेम म्हणतं तर कुणी याला आपल्याला समजून घेणारा हक्काचा आधार म्हणतं.. हे सर्व व्यक्ती परत्वे अवलंबून असतं. काही लोक नात्याला मैत्री मध्ये गुंफतात तर काही लोक याला प्रेमातील हळुवार भावना समजतात. आपल्या आजूबाजूचे अनेक लोक शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या एकाकी पडलेले असतात. धावत्या जगात एकमेकांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसल्याने खूपशा लोकांच्या आयुष्यात त्यांनी त्यांचे मन समाजसेवा अथवा छंद याकडे कितीही वळवले असले तरी एक मोठी पोकळी निर्माण झालेली असते. कधी कधी विचार जुळत नाहीत आणि मग घुसमट सुरु होते. पस्तीस चाळीस वर्ष एकत्र राहूनही खूपशा पती पत्नीचे एकमेकांशी पटत नाही..
समाज, कुटुंब आणि मुलांचा विचार करून असे लोक मजबुरीने नात्याचे जोखड ओढत राहतात. तर काही स्त्री पुरुष लग्न न मोडू देता कुणालाही शक्यतो कळणार नाही याची काळजी घेऊन दुसऱ्या कुणात गुंतून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतात. कुणाला काही बोलण्या आधी, टीका करण्या आधी ती व्यक्ती कुठल्या मानसिक त्रासातून चालली आहे याचा कुणी कधी विचार करीत नाही. मी तर सर्वार्थाने असे म्हणेल की, तुमचे वैचारिक ज्याच्याशी अथवा जिच्याशी जमेल जुळेल अशा व्यक्तींना तळहातावरच्या फोडा प्रमाणे जपून ठेवा. चांगली आणि आपल्याला समजून घेणारी माणसे मिळायला भाग्य लागते.. लोक काय म्हणतील याचा विचार केलात तर काहीच होऊ शकणार नाही. लोक घोड्यावर बसू देत नाहीत आणि पायी सुद्धा चालू देत नाहीत. आपण आपल्या आयुष्याचे आणि मनाचे राजे अथवा राणी आहोत.. आणि म्हणूनच जर आपले कुणाशी मनाशी नाते जुळत असेल तर ते समोरचा फुलविण्याची वाट बघत बसण्या आधी आपणच बिनधास्त फुलवावे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.