आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..
मात्र, पूर्वी लोकांच्या गरजा वाढलेल्या नव्हत्या. जे आहे त्यात लोक खूप समाधानी होते. एकमेकांच्या सुख दुःखात, अडीअडचणीला धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे असे लोकांचे मत होते. हल्ली मला हे हवे आहे, मला ते हवे आहे हे करण्याच्या नादात आपण आपल्या गरजा खूपच वाढविल्या आहेत. जगातलं अगदी सगळं सुख काहीही झाले तरी मला मिळायलाच हवे ही वृत्ती वाढल्याने माणूस स्वतःच स्वतःच्या हाताने कष्टी होऊ लागलेला आहे. सगळं मिळायलाच हवं असं मुळीच नाही. आनंद हा आपल्या प्रवृत्ती आणि स्वभावावर अवलंबून असतो. पाच दहा रुपयाचे चणे फुटाणे खाऊन सुद्धा चित्ती समाधानी असलेला माणूस खुश होतो. मात्र, काही मंडळींना जगातील सर्व सुखं जरी भेटली तरी ते अरे यात हे कमी आहे, त्यात ते कमी आहे असे म्हणून पूर्ण समाधानी होत नाहीत. आनंद आणि सुख मिळविण्यासाठी प्रयत्न करणे कधीच गैर नाही. मात्र, जर सगळं करूनही काही गोष्टी मिळत नसतील तर त्यासाठी दुःखी होण्याचे कारण नाही. आपण ठरविलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळत नाहीत किंवा मनासारखे घडत नाही. नको घडूदे काही फरक पडत नाही. अगदी काहीही होवो पण आनंदी राहणे हे मात्र आपल्याच हाती आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.