आपल्याकडे सण-उत्सवांना अजिबात तोटा नाही. एक संपला की दुसरा सण येतो. सण साजरे करणे आपली परंपरा आहे. त्यानिमित्ताने लोक एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात. परंपरा, धर्म आणि संस्कृती जपणे आपल्या रक्तात आहे.
मात्र हल्ली या सर्व सण -उत्सवांना आधुनिकतेचे आणि मार्केटिंगचे स्वरूप प्राप्त झाल्याने आणि विविध सार्वजनिक मंडळे व भांडवलदारांची एकमेकांत तू मोठा की मी मोठा अशी स्पर्धा लागल्याने हे उत्सव कर्णकर्कश व सर्वसामान्य, अबाल-वृद्ध आणि आजारी लोकांच्या जीवावर उठले आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.. भयंकर आवाज आणि दीर्घकाळ चालणाऱ्या मिरवणुका हे नित्याचेच झाल्याने अनेकांना आपला जीव आणि स्वास्थ्य गमवावे लागल्याची सुद्धा अनेक उदाहरणे घडली आहेत. मात्र, या विरोधात बोलणाऱ्याला धर्मविरोधी ठरविले जाते. राजकारण्यांच्या बोटचेपेवृत्तीमुळे पोलीस सुद्धा हतबल झालेले दिसण्यात येत आहे. हा सर्व मोठेपण आणि मतांचा खेळ असल्याने 'तेरी भी चूप आणि मेरी भी चूप..' असे वातावरण दिसत आहे. खरे तर आपण वैयक्तिक आणि सामूहिक आवाजाची पातळी पाळीत नसल्याने येत्या काळात हे सर्व ध्वनी प्रदूषण करणारे उत्सव कायद्याने बंद पडतील. आणि तो दिवस फार दूर नाही याची आपल्याला कल्पना असावी.. थोडक्यात काय तर आपला आनंद इतरांच्या जीवावर उठता कामा नये..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.