मुंबईकरांचं आयुष्य रेल्वेच्या ट्रॅक बरोबर सतत धावत असतं आणि त्यात बसायला कधीकाळी विंडो सीट मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योग.. वेगवेगळ्या चेहऱ्याने वावरणारी अनेक माणसं म्हणजे जणू गर्दीचा महापूर. हरवलेले चेहरे, आनंदी चेहरे, कोमेजलेले चेहरे, चेहऱ्या मागचे चेहरे, जगण्याचा रस्ता ठाऊक असलेले नसलेले चेहरेच चेहरे.. खूपदा गर्दीत असूनही माणूस एकटा असतो. रेल्वे बेंचवर बसणारे चेहरे, ट्रेनची वाट पाहणारे चेहरे, ट्रेन मधून उतरल्यावर सुटलो बाबा म्हणणारे चेहरे.. सुख दुःख ट्रेनच्या वेळापत्रकाशी बांधलेले चेहरे, जर प्लॅटफॉर्मवरच्या बेंचला बोलता आले असते तर त्याने अनेकांच्या व्यथेच्या कथा आपल्याला ऐकविल्या असत्या.. गावातून पोटापाण्यासाठी शहरात आलेले चेहरे.. घरी म्हातारे आई वडील आणि बायका मुलं सोडून आलेले चेहरे. साला सगळा जगण्याचा खोटा अट्टाहास.. आतून परिस्थिती आणि जबाबदारीच्या ओझ्याने दबलेले, मनाने मेलेले शेकडो चेहरे आणि तरी गर्दीत स्वतःला ओढत ताणत जोवर आहोत तोवर जगण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या स्टेशनकडे निघालेले शेकडो चेहरे.. यालाच तर आयुष्य म्हणतात.. आणि हेच सगळ्यांत असूनही खूपदा कुणातच नसलेलं आयुष्य टिपण्याचा मी प्रयत्न केला आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.