'अल निनो'मुळे पावसाने ओढ दिल्याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने उपलब्ध पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याअंतर्गत मुंबईत १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची बचत सुनिश्चित करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही आवश्यक मर्यादा घालण्यात आल्या आहेत..
सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्यात येणार असून नवीन बांधकामांसाठी दिल्या जाणाऱ्या जलजोडणी स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व जलतरण तलावांच्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्यात येत आहेत. मुंबईत १०८ ठिकाणी बांधकाम साईट्सवर नळ कनेक्शन देण्यात आले, तर ६० स्विमिंग पूललाही नळ कनेक्शन देण्यात आले आहेत.
१ जुलैनंतर मुंबईत पाणीकपातीत वाढ?
वरुणराजाची कृपादृष्टी न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. सध्या १५ मेपासून मुंबईत पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पाऊस समाधानकारक न झाल्यास १ जुलैनंतर आढावा घेऊन पाणीकपातीत आणखी १० टक्के वाढ करण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात २४ जून रोजी ७.९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
२४ जून रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
मोडक सागर - २६,३७५
तानसा - २,६८४
मध्य वैतरणा - २१,२५७
भातसा - ५०,२७७
विहार - १२,४९९
तुळशी - १,७७२
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.