मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे..
सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन परिस्थिती आल्यास तातडीने मदत कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सोमवार आणि मंगळवारी अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आयोजित बैठकीत राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यात १५१.२ मिलिमीटर पाऊस झाला असून मुंबई शहरामध्ये १०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
रायगड जिल्ह्यात २३६.६, ठाणे जिल्ह्यात १५८.७, रत्नागिरीमध्ये १५२.३ पावसाची नोंद झाली आहे.
दुर्घटनांची चौकशी करा - वडेट्टीवार
मुंबईत गेल्या दोन दिवसांत १२ जणांचा जीव गेला असून या दुर्घटनांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत केली.
तीन दिवस हवामानाची तीव्रता कायम
येत्या तीन दिवसांत म्हणजे ८ जुलैच्या रात्रीपर्यंत हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. सर्व जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे. दरम्यान, भूस्खलनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.