मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणीसाठ्यात किंचित वाढ होत आहे..
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणीसाठ्यात किंचित वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी पाणी पातळी ६ टक्क्यांपर्यंत घसरली असताना धरण क्षेत्रात संततधार बरसणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सातही धरणांतील पाणीसाठा २ जुलै रोजी ८.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने पाणी कपातीत वाढ करण्याबाबत आता मुंबई पालिकेने ‘थांबा व वाट पाहा’ ही भूमिका घेतली आहे.
मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो, तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठा लागतो. सध्या या धरणांमध्ये २ जुलै रोजी १ लाख १७ हजार ५३२ दशलक्ष लिटर पाणी साठा आहे. मात्र धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याने १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू केली. धरण क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने पाणी कपात वाढवण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली होती. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.