पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र..

इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हळूहळू सर्वच स्तरात जाणवू लागला आहे. घरगुती सिलिंडरसह व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा कमी होऊ लागल्याने हॉटेल व्यवसाय मंदावला असून आता पालिकेच्या शाळांनाही त्याचा फटका बसला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात गॅस आणि तत्सम इंधनांचा तुटवडा झाला आहे हे सत्य स्वीकारायला हवे.. मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पोषण आहार देणे शक्य झाले नसल्याने केळी, सफरचंद अशी फळं देण्यात आल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगर रुग्णालयांत सिलिंडरचा साठा पुरेसा आहे. परंतु उपनगर रुग्णालयांत जेवणाचा पुरवठा कंत्राटदारांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबाबत गॅस वितरण करणाऱ्या कंपनीला पत्र लिहिल्याचे उपनगर रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी सांगितले.

दरम्यान, आखातातील युद्धाची झळ भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलाही बसू लागली असून विविध व्यवसायांवर परिणाम होऊ लागला आहे. सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने पालिका मुख्यालयातील उपहारगृहात जेवणाचे वांदे होऊ लागले आहेत, तर दुसरीकडे पालिकेच्या रुग्णालयांतही चिंतेचे ढग दाटून आले आहेत. नायर, सायन, केईएम व कूपर रुग्णालयात तूर्तास तरी सिलिंडरचा तुटवडा नाही. विशेष म्हणजे पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस पुरवठा होतो, त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.

कूपर रुग्णालयात रोज एक ते दीड हजार रुग्णांचे जेवण ‘इस्कॉन’मधून येते. ‘इस्कॉन’कडे सद्य:स्थितीत सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देवादास शेट्टी यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयात १२ तासांच्या दोन शिफ्टमध्ये ३ हजार रुग्णांचे जेवण तयार करण्यात येते. परंतु, केईएम रुग्णालयात पाईपलाईनने गॅस पुरवठा होत असल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

युद्धाचा परिणाम आता थेट पालिका शाळांवर झाला आहे. मुंबईत केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या १४७ महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळांतील ५.४० लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाला मुकावे लागले. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे शक्य न झाल्याने केळी, सफरचंद अशी फळे वाटप करण्यात आल्याचे राजश्री शिरवडकर यांनी सांगितले.

45

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.