वर्ध्यातील समृद्धी महामार्गावर भरधाव आयशर ट्रकने कारला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे..
वर्धा : समृद्धी महामार्गावर सोमवारी (दि. २०) सकाळी भीषण अपघात झाला. वर्धा जिल्ह्यातील विरुळ इंटरचेंजजवळ भरधाव आयशर ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळाचे व्हिडीओही समोर आले आहेत.
भरधाव आयशर ट्रकची कारला पाठीमागून धडक
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विरुळ इंटरचेंजजवळ हा अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील चालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आयशर ट्रकचालकाचाही या अपघातात मृत्यू झाला.
दरम्यान, ट्रकमधील क्लिनर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.