अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी..
मुंबईत रविवारी अतिवृष्टीचा इशारा..
प्रादेशिक हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्याने दोन्ही जिल्हा प्रशासनांनी खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवार, ४ जुलै रोजी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच शासकीय, निमशासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाने ४ आणि ५ जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभागानेही स्वतंत्र आदेश काढून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात ४ आणि ५ जुलै रोजी अतिवृष्टीचा रेड अलर्ट घोषित करण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित, खासगी तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
कामाशिवाय कुणी घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान खात्याने सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे. रविवारी मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानखाऱ्याने वर्तविली आहे..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.