राज्यात टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिजेंदरकुमार बालेश्वर साहा व त्याचा साथीदार इंद्रजीत सिंह यांना पोलिसांनी पाटण्यातून ताब्यात घेऊन अटक केली..
भिवंडी : राज्यात टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिजेंदरकुमार बालेश्वर साहा व त्याचा साथीदार इंद्रजीत सिंह यांना पोलिसांनी पाटण्यातून ताब्यात घेऊन अटक केली. यामुळे टीईटी पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या १४ वर जाऊन पोहचली आहे.
या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर शनिवारी अटक केलेल्या बिजेंदरकुमार साहा आणि इंद्रजित या दोघांना भिवंडी अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात एस. एस. रामदिन यांच्या न्यायालयात हजर केले असता दोघांना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती ॲड. शैलेश गायकवाड यांनी दिली आहे.
२७ जून रोजी कोनगाव पोलीस ठाण्यात टीईटी पेपरफुटीप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आतापर्यंत १२ जणांना अटक झाली आहे. दरम्यान, शनिवारी पाटण्यातील समस्तीपूर येथून मुख्य सूत्रधार आरोपी बिजेंदरसह त्याचा सहकारी साथीदार इंद्रजित या दोघांना ताब्यात घेऊन पाटणा येथील हवाई अड्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून भिवंडीत आणण्यात आल्याची माहिती भिवंडी पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी दिली आहे.
या प्रकरणात पैशांचे देवाण घेवाण झाली हे तपासात समोर येणार आहे. यापूर्वी अटक १२ आरोपींपैकी काही आरोपींनी पुण्याला पेपर विकल्याचे तपासात समोर आल्याची माहितीही पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
आग्रा येथील महीम प्रिंटिंग प्रेस येथील छापखान्यात काम करणारे कामगारांशी आरोपींचा संबंध असून त्यातूनच महत्वाचे पेपर विकण्याचा प्रकार उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर बिजेंदर गुप्ता हा डायरीवरील सराईत आरोपी असून तपासात आणखी काही गुन्हेगार समोर येण्याची शक्यता उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी वर्तवली आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.