पेपरफुटी, मराठी शाळा बंद पडणे आणि विद्यार्थ्यांना भेडसवणाऱ्या विविध प्रश्नांवर काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि युवक काँग्रेसने आंदोलन पुकारले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे..
सात दिवसांत राजीनामा न दिल्यास शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दादर येथील टिळक भवन या प्रदेश मुख्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आणि युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा झीनत शबरीन यांनी ही मागणी केली. एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरातील लाखो विद्यार्थी, पालक आणि युवकांशी संवाद साधून शिक्षण मंत्री भुसे यांची एक विशेष ‘गुणपत्रिका’ तयार केली आहे. या गुणपत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी मंत्र्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन केले असून, त्यात पेपरफुटी, शालार्थ आयडी घोटाळा आणि बंद होत असलेल्या मराठी शाळा यांसारख्या विषयांचा समावेश आहे. ज्याप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागली, तशीच जबाबदारी स्वीकारून भुसेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.