जन्म व मृत्यू नोंदवहीतील नोंदींमध्ये दुरुस्ती किंवा रद्दबातल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार मुख्य निबंधकांच्या मंजुरीशिवाय कोणत्याही जन्म किंवा मृत्यूच्या नोंदी रद्द करता येणार नाहीत..
मुंबई : जन्म व मृत्यू नोंदवहीतील नोंदींमध्ये दुरुस्ती किंवा रद्दबातल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार मुख्य निबंधकांच्या मंजुरीशिवाय कोणत्याही जन्म किंवा मृत्यूच्या नोंदी रद्द करता येणार नाहीत.
आरोग्य सेवा संचालनालय व जन्म-मृत्यूचे मुख्य निबंधक यांनी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दुरुस्ती करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीकडून लेखी अर्ज घेऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ शुद्धलेखन लेखनातील त्रुटी असल्यास आवश्यक पुराव्यांच्या आधारे दुरुस्ती करता येईल. मात्र मूळ नोंदीत बदल न करता त्याची नोंद 'शेरा' स्तंभात करावी लागणार आहे.
मुलाचे नाव नोंदणीनंतर किंवा बदलल्यास ते जन्म नोंदीत थेट बदलण्याऐवजी 'अलियास' (ऊर्फ) स्वरूपात नोंदवण्याचा सल्ला देण्यात आला आहे तसेच पालकांचा घटस्फोट झाला म्हणून जन्म दाखल्यातून वडिलांचे नाव काढून टाकता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जन्म किंवा मृत्यूनंतर पत्ता बदलला तरी तो दाखल्यात समाविष्ट करता येणार नाही.
मुख्य जन्म किंवा मृत्यूची नोंद फसवणुकीने अथवा चुकीच्या पद्धतीने झाल्याचे आढळल्यास संबंधित प्रस्ताव जिल्हा निबंधकांमार्फत निबंधकांकडे पाठवावा लागेल. मुख्य निबंधकांच्या आदेशानंतरच सीआरएस (सिव्हिल रेजिस्ट्रशन सिस्टिम) पोर्टलवरील नोंद रद्द करता येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.