मराठी माणूसच मराठीचा मारेकरी ठरत आहे..
मराठी माणूस आपापसात देखील हिंदीत बोलतो म्हणून आपल्या मराठीला इतर परप्रांतीय लोक गृहीत धरू लागले आहेत. मराठी माणसाने फक्त मराठी माणसाशीच नाही तर इतर सर्वांशी महाराष्ट्रात मराठीतच बोलायला पाहिजे. आम्ही भाषा आणि प्रांत असा मुळीच भेदभाव करीत नाही. पण, इतके वर्ष मुबंईत राहून सुद्धा हिंदी सिनेसृष्टीतील बहुतांश कलाकारांना मराठी अगदी थोडीशी सुद्धा येत नसेल तर हा मराठीचा, मराठी माणसाचा आणि आपल्या महाराष्ट्राचा अपमान आहे. व्यवसाय कुठलाही असो, नोकरी धंदा असो.. पोटापाण्यासाठी परराज्यातून या लोकांनी महाराष्ट्रात यायचं, पैसे कमवायचे पण मराठी शिकायची नाही. का असं होतं तर आपणच या लोकांशी हिंदीत बोलतो तर मग यांना मराठी शिकण्याची गरजच पडत नाही. अर्धा भारत मुंबई आणि महाराष्ट्रात पोट भरायला येत असल्याने पुढे जाऊन राष्ट्रभाषा मराठी केली तर आम्हाला याचे मुळीच नवल वाटणार नाही. बावीस प्रादेशिक भाषा आपली राज्यघटना सांगत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कृतला राष्ट्रभाषा करा असे त्यावेळी सुचवले होते.
हिंदी राष्ट्रभाषा नाही हे अजूनही खूपशा लोकांना माहीतच नाही. महाराष्ट्र्र वगळता भारतातील इतर सर्वच राज्यांत त्यांच्या मातृभाषेला अर्थात तेथील प्रादेशिक भाषेला महत्व दिले जाते आणि तीच भाषा त्या विभागात बोलली जाते. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही त्यांची भाषा शिका. आणि खरंच हे खूप चांगलं आहे. त्या लोकांचं त्यांच्या मातृभाषेवर खूप प्रेम आहे. आणि आपण मराठी माणसं त्यात तरुण मुलं मुली मोठ्या स्टाईलने मराठी मराठी मित्र मैत्रिणींत हिंदी बोलतो. मराठी माणूसच मराठीच्या गळ्याला नख लावत आहे. अगोदर आपण महाराष्ट्रात अगदी सगळ्या ठिकाणी मराठी बोलायला सुरुवात केली पाहिजे आणि मगच इतरांकडून मराठीची अपेक्षा करायला पाहिजे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.