क्षणार्धात इमारत पत्यांसारखी कोसळली.. मृतांचा आकडा वाढला..

थरकाप उडवणारा CCTV व्हिडीओ समोर आल्याने लोकांमध्ये हळहळ.. 

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात दुरुस्ती आणि बांधकाम सुरू असताना बहुमजली इमारत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. इमारत कोसळतानाचा थरकाप उडवणारा क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू होते.

बांधकाम सुरू असतानाच इमारत कोसळली

माहितीनुसार, दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसजवळील सत्य निकेतन परिसरात रविवारी (दि.०६) दुपारी सुमारे १.३० वाजता ही दुर्घटना घडली. संबंधित इमारतीत विद्यार्थ्यांसाठी पेइंग गेस्ट निवासाची व्यवस्था होती. दुरुस्ती आणि बांधकामाचे काम सुरू असतानाच इमारत अचानक कोसळली. 

सहा जणांचा मृत्यू

दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. रात्री आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सहावर पोहोचली.

CCTV मध्ये भीषण क्षण कैद

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये इमारत काही क्षणांतच कोसळताना दिसत आहे. इमारतीचा ढिगारा थेट रस्त्यावर पडल्याचेही या फुटेजमध्ये दिसते. दुर्घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पसरले होते. 

अनेक यंत्रणांकडून बचावकार्य

दिल्ली पोलीस, दिल्ली अग्निशमन सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकांनी बचावकार्य हाती घेतले. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यात आला. 

१० जखमी रुग्ण ट्रॉमा सेंटरमध्ये

एम्सच्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर १० रुग्णांना जेपीएन ॲपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले. त्यापैकी पाच जणांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले, तर एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन जणांवर उपचार सुरू असून, त्यापैकी एका रुग्णावर हातापायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. एका किरकोळ जखमीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

तळघरातील बांधकामामुळे दुर्घटना घडल्याचा दावा

स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित इमारत सुमारे २० वर्षे जुनी होती. इमारतीचा पाया कमकुवत झाल्याचा दावाही स्थानिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे तळघरात सुरू असलेल्या बांधकामामुळे इमारतीची संरचना आणखी कमकुवत झाली होती का, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत तळघरात वारंवार पाणी साचत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पाणी साचणे आणि सुरू असलेल्या बांधकामाचा इमारतीच्या पाया व संरचनेवर परिणाम झाला होता का, याची तपास यंत्रणा पडताळणी करत आहे.

मालकासह संबंधितांची चौकशी होणार

पोलिसांनी इमारतीच्या मालकासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बांधकामासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, पावसाळ्यात काम का सुरू होते आणि या कामामुळे इमारतीच्या सुरक्षेवर परिणाम झाला का, याचा तपास केला जात आहे. याप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. 

या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जणांची प्रकृती स्थिर आहे. जखमींवर योग्य उपचार सुरू असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून माहिती दिली जात आहे.

दरम्यान, कोसळलेल्या इमारतीतील तसेच शेजारील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले.

37

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.