राजस्थान : हंस ट्रॅव्हल्सची ही बस ऋषिकेशहून मध्य प्रदेशातील इंदूरकडे जात होती.दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बुधवारी (दि. १) पहाटे भीषण अपघात झाला. प्रवासी बसने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून धडक दिल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या भीषण दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अपघातानंतर घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले..
दौसा जिल्ह्यातील धनावडा परिसरात अपघात
ही दुर्घटना राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनावडा परिसरात घडली. हंस ट्रॅव्हल्सची ही बस ऋषिकेशहून मध्य प्रदेशातील इंदूरकडे जात होती. द्रुतगती मार्गावर पुढे जाणाऱ्या ट्रकला बसने मागून धडक दिल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला.
८ जणांचा मृत्यू, २४ जखमी :
दौसा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पियुष दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. दोन जणांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आणखी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील २४ जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू :
अतिरिक्त पोलीस अधीक्षक शंकरलाल यांनी सांगितले की, मृतांपैकी एका व्यक्तीची ओळख धर्मेंद्र अशी झाली आहे. उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, जळालेल्या मृतदेहांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्रशासन मदतीसाठी सज्ज :
दौसाचे खासदार मुरारीलाल मीणा यांनी घटनास्थळी भेट देत जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत संपूर्ण प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.