मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत आता मागे हटणार नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळविण्यासाठी ही शेवटची आरपारची लढाई असेल. येत्या २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केली..
कराड तालुक्यातील पाचवड येथे मंगळवारी सायंकाळी आयोजित मराठा समाजाच्या सभेत ते बोलत होते. जरांगे-पाटील हे कराड आणि पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. जरांगे-पाटील म्हणाले की, अनेक वर्षे मराठा समाजाने राजकीय नेत्यांना मतदान करून मोठे केले; मात्र समाजाच्या प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष देण्यात आले नाही. आता मराठ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सोबत राहण्याची भूमिका समाजाने घ्यावी, मग तो कोणत्याही पक्षाचा असो.
कुणबी जात प्रमाणपत्र आणि कुणबी नोंदींची तपासणी करण्याचे काम शासनाकडून सुरू होते. मात्र, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी केला. शासनाच्या धरसोड धोरणामुळे मराठा समाजात असंतोष वाढत असून, त्याचे परिणाम झाल्यास शासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला. “मी कोणत्याही पक्षाचा किंवा व्यक्तीचा नाही.
मराठा लोकप्रतिनिधी गप्प हे दुर्दैव
मराठ्यांच्या जीवावर राजकारण करणारे काही लोकप्रतिनिधी समाजाच्या प्रश्नावर ठामपणे भूमिका घेत नाहीत, हे दुर्दैव आहे. मात्र, मराठा समाजात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असून आगामी काळात समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असेही जरांगे-पाटील यांनी सांगितले.सभेला कराड तालुक्यातील काले, आटके, वाठार यांसह विविध गावांमधील मराठा समाजाचे कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.