मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ८१ लाख महिलांना वगळण्यात आले असले तरी त्यापैकी अपात्र ठरलेल्या महिलांकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या लाभाचे पैसे वसूल केले जाणार नाहीत. अपात्र महिलांना एकवेळ माफी दिली जाणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले..
मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केवळ महिलांसाठी असतानाही ज्या १४ हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला, त्यांच्याकडून लाभाची रक्कम वसूल केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्यावेळी या योजनचे २ कोटी ४७ लाख लाभार्थी होते. लाभार्थ्यांना केवायसी बंधनकारक करून निकष तपासायला सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही संख्या कमी होऊन मे महिन्याअखेरीस लाभार्थ्यांची संख्या १ कोटी ६६ लाखांवर येऊन ठेपली. यावरून विरोधकांनी महायुतीवर टीकेची झोड उठवली असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी का झाली? याबाबत खुलासा केला.
“आम्ही डेटाबेसद्वारे लाभार्थ्यांची पडताळणी करू लागलो, त्यावेळी या योजनेचा लाभ घेणारे १४ हजार पुरुष निघाले. ज्यांनी महिलांच्या नावे अर्ज केले होते. ५ लाख सरकारी कर्मचारी निघाले ज्यांनी योजनेसाठी अर्ज केला होता. १० लाख महिला प्राप्तीकर भरणाऱ्या निघाल्या. तर ४ ते ५ लाख महिला अशा होत्या की, ज्यांच्या घरी गाडी आहे. ईकेवायसी सक्तीची केल्यानंतर या सगळ्यांनी ई-केवायसी केली नाही. त्यामुळे जे योजनेसाठी अपात्र ठरले त्यांचेच मानधन थांबवले आहे. २५ लाख महिलांची केवायसी चुकली होती त्यांना ती दुरुस्त करण्यास सांगितले आहे,” असे फडणवीस म्हणाले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.