देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेली ‘नीट-यूजी’ पुर्नपरीक्षा रविवारी देशात व परदेशात कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (एनटीए) द्वारे भारतातील ५५१ शहरांमधील ५,४४० केंद्रांवर आणि परदेशातील १४ केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही पुनर्परीक्षा दिली..
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्लीतील ओखला येथील ‘एनटीए’ मुख्यालयात ‘नीट यूजी’ पुनर्परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. ही परीक्षा दुपारी २ ते ५.१५ या वेळेत झाली, तर दिव्यांग उमेदवारांना संध्याकाळी ६.२० वाजेपर्यंत परीक्षा लिहिण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र, काही परीक्षार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परीक्षा केंद्रांवर पोहोचताना येणाऱ्या प्रवासाच्या अडचणींकडे लक्ष वेधले. भोपाळमध्ये, दोन विद्यार्थ्यांना उशिरा आल्यामुळे केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. कोलकाता आणि त्याच्या लगतच्या भागात मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे शहराच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला.
ही परीक्षा इंग्रजी आणि १२ भारतीय भाषांमध्ये घेण्यात आली. ९५,००० हून केंद्र, सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ही परीक्षा झाली. इलेक्ट्रॉनिक्स गैरप्रकारांपासून परीक्षा सुरक्षित ठेवण्यासाठी ५१,३११ जॅमर्स तैनात करण्यात आले होते.
मोदी विमानतळावर थांबले
रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्याहून दिल्लीत पोहचले. ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या उमेदवारांना वाहतूक निर्बंधांमुळे त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी आपल्या निवासस्थानी जाण्याचा प्रवास पुढे ढकलला.
बुरखा वादावर ‘एनटीए’चे स्पष्टीकरण
अजमेरमधील परीक्षा केंद्रावर बुरखा घातलेल्या कुलसुम बानो या परीक्षार्थीला प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला. तिने सांगितले की, ती आधीच्या परीक्षेलाही याच पोशाखात बसली होती. मात्र, यावेळी तिला दुपट्टा व बुरखा काढण्याचा आग्रह धरण्यात आला.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.