श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी..

अशोकधाम हॉल्टवर एकाच वेळी दोन गाड्या आल्याने गर्दीत अचानक गोंधळ उडाला आणि परिस्थितीचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले..

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरांमध्ये गर्दी करत आहेत. अशातच, बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (१७ तारखेला) पहाटे अशोकधाम मंदिराबाहेर भाविकांची प्रचंड गर्दी जमली असताना चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत सात ते आठ महिलांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अचानक गोंधळ: बॅरिकेड्स कोसळले आणि चेंगराचेंगरी झाली

प्राथमिक माहितीनुसार, अशोकधाम रेल्वे स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी जमली होती. सकाळी गर्दी वाढत असतानाच वाटेत एक विजेचा खांब पडला. काही भाविकांना विजेचा धक्का लागल्याची बातमी पसरताच लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करू लागले. या गोंधळात बॅरिकेड्स कोसळले, ज्यामुळे अनेकजण खाली पडले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली.

दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, जिल्हा प्रशासनाने या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी नीरज कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भाविकांचा मृत्यू चेंगराचेंगरीत चिरडले गेल्यामुळे झाला, विजेचा धक्का लागल्यामुळे नाही. घटनेच्या वेळी त्या भागातील वीजपुरवठा बंद होता आणि विजेच्या तारांवर आवरण (इन्सुलेशन) होते, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

दोन गाड्या एकाच वेळी आल्याने गोंधळ निर्माण झाला का?

प्रशासनाच्या प्राथमिक चौकशीनुसार, सोमवारी सकाळी अशोकधाम हॉल्टवर विरुद्ध दिशेने दोन गाड्या एकाच वेळी आल्या. गाड्या पाहताच काही तरुणांनी अचानक धावण्यास सुरुवात केली. आधीच प्रचंड गर्दी असलेल्या भागात यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याच दरम्यान विजेचा खांब कोसळला. खांब पडल्यामुळे लोकांना विजेचा धक्का लागला आहे, अशा अफवा गर्दीत वेगाने पसरल्या.

या अफवेमुळे भाविकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकजण सुरक्षित ठिकाणांकडे धावू लागले. अचानक वाढलेल्या गर्दीच्या रेट्यामुळे बॅरिकेड्स कोसळली. अनेक भाविक खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून इतर लोक गेल्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत आठ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

45

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.