देशातील सर्वात मोठ्या विमान अपघातांपैकी एक असलेल्या या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही दु:खद अंत झाला असून रमेश विश्वासकुमार हा एकमेव प्रवासी बालंबाल बचावला आहे. या अपघातानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे..
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादहून २४२ प्रवासी व क्रू मेंबर्ससह लंडन गॅटविक्सला निघालेले एअर इंडियाचे ७८७ ड्रीमलायनर विमान अवघ्या काही क्षणांतच मेघाणीनगर परिसरात कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले. कोसळल्यानंतर स्फोट होऊन विमान आगीत भस्मसात झाले. त्यामुळे विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी आश्चर्यकारकरीत्या बचावला. हे विमान निवासी डॉक्टरांच्या इमारतीवर आदळल्याने तेथील २४ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले, तर ५० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह एकूण २६५ जण मृत्युमुखी पडले आहेत.
तब्बल २४२ प्रवाशांना घेऊन निघालेले हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच निवासी भागात कोसळल्याने हा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. विमानातील २४१ प्रवाशांचा जळून कोळसा झाला. त्यामुळे घटनास्थळाचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. विमान ज्या ठिकाणी कोसळले, त्या निवासी डॉक्टरांच्या इमारतीत दुपारचे जेवण घेत असलेले २४ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचाही या दुर्घटनेत अंत झाला असून ५० जण जखमी झाले आहेत. यापैकी अनेक जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
देशातील सर्वात मोठ्या विमान अपघातांपैकी एक असलेल्या या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही दु:खद अंत झाला असून रमेश विश्वासकुमार हा एकमेव प्रवासी बालंबाल बचावला आहे. या अपघातानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
एअर इंडियाच्या ‘ड्रीमलायनर’ ७८७ विमानाने (एआय-१७१) गुरुवारी दुपारी १.३० वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण घेतले. मात्र, काही क्षणार्धातच हे विमान अहमदाबादमधील एक हॉस्पिटल आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या परिसरात कोसळले. विमान कोसळल्यानंतर स्फोट होऊन सर्वत्र आगीचे व धुराचे लोळ उठले. त्यामुळे एकच घबराट पसरली. विमानातील इंधनाच्या टाक्या फुल असल्यामुळे काही सेकंदातच आगीने उग्र रुप धारण केले. दूरवरून आकाशात आगीचे आणि धुराचे लोट पाहायला मिळाले.
अपघातानंतर तत्काळ मदतकार्य राबवण्यात आले, मात्र आगीत अनेक प्रवाशी होरपळून गेले. त्यामुळे बहुतांश प्रवाशांची ओळख पटवणेही मुश्कील होऊन बसले आहे. त्यामुळे गुजरात सरकारने प्रवाशांच्या नातेवाईकांकडून डीएनए सॅम्पल मागवले आहेत.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या विमानातून २३० प्रवासी प्रवास करत होते. त्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, पोर्तुगालचे ७, कॅनडाच्या एका प्रवाशाचा समावेश आहे. तसेच विमानात पायलट आणि को-पायलटसह १२ क्रू मेंबर्सही होते. या विमानाचे संचालन कॅप्टन सुमित सभरवाल करत होते. एअर इंडियामध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले तसेच ८,२०० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव त्यांच्याकडे होता. को-पायलट क्लाईव्ह कुंदर यांनीही १,१०० तासांहून अधिक उड्डाण केले आहे.
विमानाने उड्डाण घेतल्यानंतर एका मिनिटातच वैमानिकाने ‘मे-डे’ कॉल हा आपत्कालीन संदेश एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला होता. मात्र, त्यानंतर त्यांचा काहीच प्रतिसाद मिळू शकला नाही. विमान अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी आता विमानातील ब्लॅकबॉक्सचा शोध घेतला जात आहे. एक तर विमानातील दोन्ही इंजिन फेल झाल्यामुळे किंवा पक्ष्याची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला असावा, असे विमान वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे. हे विमान निवासी भागात कोसळले असल्यामुळे स्थानिक इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. विमान अपघातानंतर अहमदाबादमधील सर्व विमानांचे उड्डाण स्थगित करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त विमानात होते ७ मराठी प्रवासी
विमान अपघातातील मृतांमध्ये एकूण ७ मराठी प्रवाशांचा समावेश आहे. त्यापैकी ४ जण हे केबिन क्रू व ३ जण प्रवासी म्हणून विमानात प्रवास करत होते. अपर्णा महाडिक, महादेव पवार, आशा पवार, मयुर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशनी सोंघरे या ७ मराठी प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. यापैकी अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, दीपक पाठक व रोशनी सोंघरे हे चार जण एअर इंडियाचे केबिन क्रू होते.
सोलापूरमधील पती-पत्नीचाही मृत्यू
अहमदाबादमध्ये घडलेल्या विमान अपघातात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याच्या हातीद गावातील दोघांचा मृत्यू झाला आहे. महादेव तुकाराम पवार आणि आशाबेन महादेव पवार अशी पती-पत्नींची नावे आहेत. महादेव यांचा मोठा मुलगा लंडनमध्ये असून दुसरा मुलगा गुजरातमध्ये काम करत आहे. लंडनमधील मुलाला भेटण्यासाठी गुजरातमधील मुलाच्या घरी राहत असलेले हे पती-पत्नी गुरुवारी एअर इंडियाच्या विमानातून जात असताना हा अपघात झाला. विमान कंपनीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी जाहीर केली असून त्यात १८५ आणि १८६ क्रमांकाच्या सीटवर त्यांची नावे आहेत.
अपघाताची अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू - बोईंग
अहमदाबादमधील विमान अपघाताच्या सुरुवातीच्या अहवालांची माहिती मिळाली आहे. आम्ही अधिक माहिती गोळा करण्याचे काम करत आहोत, असे ‘ड्रीमलायनर’ या विमानाचे उत्पादन करणाऱ्या ‘बोईंग’ कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, ‘सेफ्टी ऑपरेटिंग सिस्टम्स’चे सीईओ, एव्हिएशन कन्सल्टंट जॉन एम. कॉक्स यांनी लॉस एंजेलिस येथून सांगितले की, अपघाताचे पहिले फोटो खराब असले तरी, विमानाचे नाक वर होते आणि ते चढत नव्हते असे दिसते. सध्या या टप्प्यावर आम्हाला बरेच काही माहित नाही, असे बोईंगने सांगितले.
‘बोईंग’चे शेअर घसरले
अहमदाबाद येथे बोईंग विमानाचा अपघात झाल्याचे उघड झाल्यानंतर वॉल स्ट्रीट येथील शेअर बाजारात बोईंग कंपनीच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. बोईंगचे समभाग जवळपास ८ टक्क्याने घसरले.
घटना धक्कादायक - नरेंद्र मोदी
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शोक व्यक्त केला आहे. “अहमदाबादमधील ही घटना अत्यंत धक्कादायक आणि दु:खद आहे. हा धक्का पचवणे कठीण आहे. या कठीण काळात आम्ही मृत प्रियजनांच्या पाठीशी आहोत. घटनास्थळी तत्काळ मदतकार्य राबवण्याचे आदेश देण्यात आले असून आम्ही प्रशासन तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात आहोत,” असे मोदींनी शोकसंदेशात म्हटले आहे.
अनेक मृतदेह खाक, ओळख पटवणेही कठीण
विमान अपघातामुळे अनेक प्रवाशांचे मृतदेह जळून खाक झाले आहेत. अनेक मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना बोलवून डीएनएद्वारे ओळख पटवली जाईल, असे गुजरातच्या आरोग्य सचिवांनी सांगितले.
टाटा समूहातर्फे मृतांच्या नातेवाईकांना एक कोटी
विमान अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना १ एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा टाटा समूहाने केली आहे. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. टाटा समूहाचे व एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की, "या क्षणी आपल्याला जे दुःख होत आहे ते शब्दात व्यक्त करता येत नाही. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत आणि जे जखमी झाले आहेत, त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. टाटा समूहातर्फे मृतांच्या नातेवाईकांना १ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तसेच बी. जे. मेडिकल हॉस्टेल बांधणीसाठी सर्वतोपरी सहाय्य केले जाईल.
अमेरिका चौकशी पथक पाठवायला तयार
भारतीय अधिकाऱ्यांनी विनंती केल्यास एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मदत करण्यासाठी एक पथक पाठवण्यास तयार असल्याचे अमेरिकन सरकारने सांगितले. ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’ने म्हटले आहे की, राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ हे अमेरिकन सरकारचे प्राथमिक प्रतिनिधी असेल आणि ‘एफएए’ हे तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ हे दरवर्षी सुमारे ४५० आंतरराष्ट्रीय अपघातांची कारणे निश्चित करण्यात नियमितपणे मदत करते.
जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला फक्त मृतदेह दिसले !
विमान अपघातात ‘११ अ’ सीटवर बसलेले रमेश विश्वास कुमार हे एकमेव प्रवासी वाचले आहेत. त्यांनी सांगितले की, ‘उड्डाणानंतर ३० सेकंदांनी विमान प्रचंड आवाज करीत कोसळले. त्यानंतर माझी शुद्धच हरपली. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्याभोवती सर्वत्र मृतदेह व विमानाचे तुकडे विखुरलेले होते. घाबरून मी पळू लागलो असता कोणीतरी मला उचलून रुग्णवाहिकेत ठेवले’. ४० वर्षीय रमेश विश्वासकुमार हे ब्रिटिश नागरिक असून काही दिवसांपूर्वीच ते कुटुंबीयांना भेटण्यासाठी भारतात आले होते. आपले भाऊ अजय कुमार रमेश (४५) यांच्यासह ते पुन्हा लंडनला जाण्यासाठी या विमानात बसले होते.
महाराष्ट्र सरकारतर्फे हेल्पलाइन क्रमांक जाहीर
अहमदाबाद विमान अपघातानंतर महाराष्ट्र सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी केले. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९ आणि ९३२१५८७१४३ हे क्रमांक जाहीर केले आहेत. तसेच १,०७० हा आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केला आहे. या दुर्घटनेशी संबंधित माहितीसाठी नातेवाईक आणि बाधित नागरिक या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात, असे त्यात म्हटले आहे.
मृतांची आकडेवारी..
भारतीय - 168
ब्रिटिश - 53
कॅनडा - 1
पोर्तुगाल - 7
पायलट, को पायलटसह क्रू मेंबर - 12
प्रशिक्षणार्थी भारतीय डॉक्टर - 24
एकूण : 265
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.