घारापुरीत सापडले दोन ऐतिहासिक ताम्रपट.. चालुक्य, त्रैकुटक राजवंशांच्या कालखंडातील सागरी व्यापाराचे नवे पुरावे..

उरण : जागतिक वारसा स्थळ असलेल्या मुंबईच्या किनारपट्टीजवळील घारापुरी (एलिफंटा) बेटावरील मोराबंदर भागात सुरू असलेल्या पुरातत्वीय उत्खननात दोन ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ताम्रपट सापडले आहेत. यामुळे चालुक्य व त्रैकुटक राजवंशांच्या कालखंडातील सागरी व्यापाराचे नवे पुरावे हाती लागले आहेत..

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळाने २०२५-२६ च्या उत्खनन हंगामात हे ताम्रपट शोधून काढले आहेत. गोदामसदृश वास्तूच्या अवशेषांजवळ मिळालेल्या दोन मोठ्या रांजणांपैकी एका रांजणामध्ये हे ताम्रपट सुरक्षितरीत्या ठेवलेले आढळले. या ऐतिहासिक शोधामुळे एलिफंटा बेटाचे राजकीय, आर्थिक आणि सागरी महत्त्व नव्याने अधोरेखित झाले असून, हे बेट केवळ एक धार्मिक केंद्र नसून प्राचीन काळातील प्रमुख व्यापारी, प्रशासकीय आणि सागरी केंद्र होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मोराबंदर येथील उत्खननात यापूर्वी प्राचीन सागरी व्यापाराची साक्ष देणारे अनेक अवशेष मिळाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने रोमन अँफोरीचे तुकडे (दारू किंवा तेल साठवण्याची प्राचीन भांडी), पश्चिम आशियाई टॉरपेडो जार, नीलमणी चकचकीत भांडी (टकॉईज ग्लेज्ड वेअर), हॅच्ड ग्राफिएटो बेअर, दगडांचे नांगर, लोखंडी तुकडे, आयात केलेली मातीची भांडी, नाणी आणि प्रगत जल-व्यवस्थापनाची साक्ष देणारा एक पायऱ्यांचा पाण्याचा साठा (stepped water reservoir) यांचा समावेश आहे. या सर्व अवशेषांवरून प्राचीन काळी या बेटावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर दूरवरच्या देशांशी सागरी व्यापार चालत असल्याचे स्पष्ट होते.

सापडलेल्या दोन ताम्रपटांपैकी पहिला ताम्रपट 'नवसारिकाचे चालुक्य' (आधुनिक नवसारी, गुजरात) या घराण्याशी संबंधित आहे. हे घराणे ७ व्या आणि ८ व्या शतकात दक्षिण गुजरात, उत्तर कोकण आणि नाशिक परिसरावर राज्य करत होते. या घराण्याची स्थापना बदामीचे प्रसिद्ध चालुक्य सम्राट पुलकेशी द्वितीय यांचे पुत्र आणि राजा विक्रमादित्यचे बंधू 'धराश्रय जयसिंहवर्मन' यांनी केली होती. या ताम्रपटासोबतअसलेल्या राजमुद्रेवर स्पष्ट अक्षरांत "श्रीजयाश्रयः" असे कोरलेले आहे. यावरून हा ताम्रपट या वंशातील पराक्रमी राजा 'जयाश्रय मंगलरस' यांच्या काळातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

त्रैकुटक घराण्याचे संस्थापक इंद्रसेन यांचा दुर्मिळ ताम्रपट

आतापर्यंत त्रैकुटक राजवंशाचे केवळ पाच ताम्रपट (पार्डी, सुरत, कान्हेरी आणि मातवण येथे) उपलब्ध होते. विशेष म्हणजे, या वंशाचे संस्थापक 'इंद्रदत्त' यांच्या नावाचा कोणताही थेट शिलालेख किंवा नाणे आजवर मिळाले नव्हते, त्यांचा उल्लेख केवळ त्यांच्या पुत्रांच्या ताम्रपटांवरून अप्रत्यक्षपणे होत असे. मात्र, घारापुरी येथे सापडलेला ताम्रपट राजा 'इंद्रसेन' (इंद्रदत्त) यांचा असल्याने, त्रैकुटक घराण्याच्या संस्थापकाचा हा जगातील पहिला आणि एकमेव थेट लिखित ऐतिहासिक पुरावा ठरण्याची शक्यता आहे.

42
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.