आमदार सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर बसवण्याची तयारी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंची राजकीय नाकाबंदी करण्याची खेळी केल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले..
अहिर यांना सत्तेतील पदाच्या माध्यमातून बळ देत २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला आहे. सचिन अहिर हे जुलै २०२२ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. मात्र, त्यानंतर लगेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. या बंडावेळी अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाल्याने अनेकांप्रमाणे अहिर यांनाही पुढील राजकीय भवितव्याची चिंता सतावत होती. अहिर यांची विधानपरिषदेची मुदत जुलै २०२८ मध्ये संपत आहे. ठाकरे गटाचे विधानसभेतील संख्याबळ पाहता अहिर यांना विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत साशंकता होती. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले.
आदित्य यांच्या विरोधात आगामी निवडणुकीत सचिन अहिर वरळीत लढणार का हे पाहणे येत्या काळात खूप रंजक ठरणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या खेळीने आदित्य ठाकरे यांना आता सावध राहावे लागणार आहे..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.