राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील महाविकास आघाडीत सुरू असलेल्या चर्चामध्ये कोणताही तिढा निर्माण झाला नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. आगामी राज्यसभा निवडणुकीतील एकमेव जिंकण्याजोगी जागा संख्याबळाच्या आधारे शिवसेना ठाकरे गटालाच मिळायला हवी, असा ठाम दावाही त्यांनी केला..
महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना आदित्य ठाकरे म्हणाले, "राज्यसभेसाठीच्या चर्चामध्ये कोणताही तिढा नाही. सर्व पक्षांमध्ये संवाद सुरू आहे. राज्यसभेच्या जागेसाठी आम्ही आमचा दावा मांडला आहे. संख्याबळ आणि महाविकास आघाडीने ठरवलेल्या रोटेशन पॉलिसीनुसार ही जागा शिवसेना ठाकरे गटाने लढवायला हवी."
शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनीही सांगितले की, १६ मार्चच्या निवडणुकीपूर्वी एकमेव राज्यसभा जागेसाठी महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना (उबाठा) ची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.