मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ला मान्यता देण्यात आली. हे धोरण २०३०पर्यंत लागू राहील..
मुंबई : राज्यातील बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक वाहन धोरणाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांना मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पथकर (टोल माफी) देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ला मान्यता देण्यात आली. हे धोरण २०३०पर्यंत लागू राहील. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अशा १ हजार ९९३ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतूदीसही यावेळी मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन व वापरास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. यामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर व विक्रीमध्ये मोठी वाढ अपेक्षीत आहे.
या धोरणांतर्गत मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (समृद्धी महामार्ग) यावर प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना व बसेसना पथकर पूर्ण माफ करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अन्य राज्य व राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना पथकरात पन्नास टक्के इतकी सवलत देण्यात येईल.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.