राज्यातील शासकीय शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तपासणीनंतर दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत..
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अलीकडेच शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला.
या करारानुसार राज्यातील शासकीय शाळांमधील पाचवी ते दहावीच्या २० लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रकल्प अंमलबजावणी भागीदार म्हणून कार्य करणार असून वनसाईट एस्सिलार लक्सोटिका फाउंडेशन तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहील. दृष्टीदोष असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही ही संस्था घेणार आहे.
या कराराचा कालावधी ३६ महिन्यांचा राहणार आहे. या कालावधीत राज्यभरात डोळे तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येईल.
६३ हजारांहून अधिक चष्म्यांचे वाटप
यापूर्वी २०१९ पासून या उपक्रमाद्वारे १८ जिल्ह्यांतील ८०० शाळांमधील ६ लाख ८० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून ६३ हजारांहून अधिक चष्मे पुरविण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आजारांचे आणि तक्रारींचे वेळेत निदान आणि त्यावर उपचार होण्यास मदत होणार आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.