महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ च्या कथित प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आणखी तीन जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आरोपींची एकूण संख्या ७ झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली..
विशेष तपास पथकाने सोनू सिंह, मिथुन सिंह आणि कपिल दहिया या तिघांना उत्तर प्रदेशातून अटक केली. या त्रिकुटाला गुरुवारी स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन अटकेसह या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अनेक राज्यांत जाळे :
२८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर तसेच ठाण्यातून तिघांना अटक केल्यानंतर आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आली होती. एसआयटी तपासात रॅकेटचे जाळे दिल्ली, आग्रा, बिहार, हरयाणामध्ये पसरल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रातील ६ लाख विद्यार्थ्यांना फटका
मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी एसआयटीने अनेक राज्यांमध्ये पथके रवाना केली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नीट-यूजी पेपर फुटीच्या राष्ट्रीय पातळीवरील गोंधळानंतर आता टीईटी पेपर फुटीचे हे प्रकरण समोर आले असून याचा फटका महाराष्ट्रातील जवळपास ६ लाख उमेदवारांना बसला आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.