मनोहर नावाच्या एका स्थानिक ग्रामस्थाने पीडितांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली होती. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील कचरिया गावात एका भरधाव वेगाने जाणाऱ्या इको व्हॅनने दुचाकीला धडक दिल्यानंतर व्हॅन विहिरीत पडून ११ जणांचा मृत्यू झाला..
मंदसौर : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील कचरिया गावात एका भरधाव वेगाने जाणाऱ्या इको व्हॅनने दुचाकीला धडक दिल्यानंतर ती व्हॅन थेट विहिरीत पडून १२ जणांचा मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली. प्रवाशांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या गावातील मनोहर सिंह यांचाही मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, नारायणगड पोलीस स्टेशन परिसरात रविवारी दुपारी १:१५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. व्हॅनमधील सर्व जण उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल येथील नागरिक होते. ते सर्व नीमच जिल्ह्यातील मानसा भागातील अंतरी माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात होते. इको व्हॅनने प्रथम दुचाकीस्वाराला धडक दिली, त्यानंतर कार रस्त्याजवळील विहिरीत कोसळली.
व्हॅनमध्ये दोन मुलांसह १३ जण बसले होते. त्यापैकी चार जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून मंदसौर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार व दुचाकीवरील एकूण ११ जण या अपघातात ठार झाले.
अपघात नेमका कसा घडला हे समजू शकलेले नाही. मात्र, व्हॅन भरधाव असल्याने दुचाकीला धडकल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट विहिरीत पडली, असे सांगितले जात आहे.
गावकऱ्यांनी सुरू केले बचावकार्य
घटनेनंतर गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली आणि विहिरीत दोरी टाकून बचावकार्य सुरू केले. गावकऱ्यांनी तीन वर्षांची मुलगी आणि दहा वर्षांच्या मुलासह किमान चार जणांना वाचवले.
व्हॅनमधील एलपीजी सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे मनोहरचा मृत्यू?
मनोहर नावाच्या एका स्थानिक ग्रामस्थाने पीडितांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली होती. परंतु गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. व्हॅनमधील एलपीजी सिलेंडरमधून बाहेर पडणाऱ्या गॅसमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. "मनोहर सिंग यांनी प्रचंड धाडस दाखवले आणि लोकांचे प्राण वाचवले. मनोहर विहिरीत बेशुद्ध पडला. तो विहिरीतून बाहेर न आल्याने गावकऱ्यांनी बचावकार्य थांबवले, पोलिस आणि एसडीईआरएफ पथके घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्य पुन्हा सुरू झाले. आम्ही प्रथम विषारी वायू बाहेर काढण्यासाठी कॉम्प्रेसरचा वापर केला आणि नंतर विहिरीतून पाणी बाहेर काढले. बचावकार्य चार ते पाच तास चालले," असे रतलाम रेंजचे उपमहानिरीक्षक मनोज सिंग यांनी सांगितले.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.